‘विद्येनेच मनुष्या
आले श्रेष्ठत्व या जगा माजी | न दिसे एकहि वस्तु विद्येनेहि असाध्य
आहे जी||’
आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या या
मोरोपंतांच्या आर्येतून शिक्षणाचे/विद्येचे महत्वच अधोरेखित झालेले आहे.
मनुस्मृति सारख्या प्राचीन ग्रंथानीहि
शिक्षणाची उद्दिष्टे काय असावीत, हे ठळकपणे नमूद करून ठेवलेले आहे. मनुस्मृतीच्या
चौथ्या अध्यायांतील नवव्या श्लोकांत मनुने कोणत्या विषयांचे अध्ययन करावे व ते
कशासाठी करावे,हे विस्तृतपणे मांडलेले आहे. त्यामध्ये शिक्षणाची ४ उद्दिष्टे
दिलेली आहेत.
१)
ज्यामुळे
बुद्धीचा विकास होईल,
२)
ज्यामुळे
माणसाच्या ज्ञानांत/विद्येत भर पडेल,
३)
जी धन
अथवा उपजीविकेचे साधन मिळवून देईल, व
४)
जी
विद्या अंतिमतः व्यक्ति, समाज व
राष्ट्र यांच्या हिताची ठरेल
अशाच विषयांचे अध्ययन करावे, असे मनुस्मृति आग्रहाने सांगते.
आज इतक्या कालावधीनंतरही शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये
फारसा फरक पडलेला नाही. शिक्षण घेतल्या नंतर विद्यार्थी समर्थ बनून समाजाची सेवा
करण्यासाठी पुढे आले पाहिजेत,हेच शिक्षणाचे आजहि अंतिम उद्दिष्ट आहे.
‘श्रुती-स्मृती आणि कृती’ हे जुन्या शिक्षणाचे मर्म होते. गुरुमुखातून
बाहेर पडलेले ज्ञान ऐकणे, लक्षांत ठेवणे व व्यवहारांत त्याचा उपयोग करणे, असाच
त्याचा अर्थ आहे.
वैदिक काळांत ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती होती. वयाच्या आठव्या वर्षानंतर
मुलाला गुरुकडे पाठवून, तिथेच आश्रमांत राहून १०-१२ वर्षे शिक्षण घ्यावे लागे.
शिक्षणाचे विषय, विद्यार्थ्याचा कल बघून गुरुच ठरवीत असत. साधारणपणे ब्राह्मण व
क्षत्रियांच्या मुलांना वेद व धनुर्विद्येचे शिक्षण दिले जात असे. शिक्षणाचे स्वरूप
‘श्रुती-स्मृती व कृति’ असेच असे. पण याच काळांत ‘वैश्य व शुद्रांच्या’ व
मुलींच्या शिक्षणाची काय सोय होती, याचे उल्लेख आर्ष वाङमयांत कुठे आढळत नाहीत.
बहुतेक घरीच मुलांना वडिलांकडून पारंपारिक व्यवसायाचे शिक्षण मिळत असावे. हीच
परंपरा सम्राट अशोकाच्या काळांतहि चालू होती. बुद्धाने सर्वप्रथम सर्व वर्णांतील
तरुणांना ‘भिक्षु संघांत’ प्रवेश देवून कमीतकमी धार्मिक शिक्षणाचा तरी मार्ग खुला
केला. स्त्रियाना भिक्शुसंघात प्रवेश देण्यास बुद्धाचाही सुरुवातीस विरोधच होता.
पण नंतर त्याचा शिष्य ‘आनंद’ याच्या आग्रहाखातर त्याने त्याच्या शेवटच्या काळांत
स्त्रियांना भिक्शुसंघात प्रवेश देण्याची अनुमती दिली. पण तरीही त्या काळांत सर्व
मुलांना आजच्या अर्थाने औपचारिक शिक्षण देण्याची कांही व्यवस्था भारतांत कुठेच
अस्तित्वांत नव्हती. बुद्ध काळापर्यंत तरी ‘लिपी’ किंवा लिहिण्याची कला
अस्तित्वांत असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. सर्व भर ‘पाठांतरावर’च होता, असे
दिसते. बुद्धाच्या काळांत ‘चातुर्वर्ण्य व्यवस्था’ बळकट असली तरी ‘व्यवसायानुरूप
जातिव्यवस्था’ अद्याप बळकट झालेली नव्हती. पण पुढे अशोकाच्या काळापर्यंत जातिव्यवस्था
दृढमूल झालेली आढळते. तिथून पुढे जातीनुरूप ज्या त्या व्यवसायाचे शिक्षण मागच्या
पिढीकडून पुढच्या पिढीला घरांतच दिले जात असे. गरजे पुरते तोंडी हिशेब वगैरेचे
शिक्षणही घरांतच मिळत असावे. पण लौकिकार्थाने ‘लिहिण्या-वाचण्याच्या’ शिक्षणा
अभावी या लोकांची प्रचंड फसवणूक वरिष्ठ वर्गांकडून प्रत्यही होत असावी. जवळपास हीच
परिस्थिती सर्वसाधारणपणे इंग्रजांच्या आगमनापर्यंत कायम होती,असे म्हणायला हरकत
नाही.
इसवीसनापूर्वी
तिसऱ्या शतकांत ‘तक्षशिला विद्यापीठ’ व इसवीसनाच्या सहाव्या व सातव्या शतकांत
‘नालंदा विद्यापीठ’ नावारुपाला आलेले दिसते. पण या दोन्ही विद्यापीठातून तरी सर्व
वर्णाच्या विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश होता का, याविषयी शंका आहे. नालंदा
विद्यापीठामध्ये परदेशांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याचा मात्र उल्लेख
आहे.
इस्लामी राजवटीत मुस्लीम
विद्यार्थ्यांना मशिदिशी संलग्न मदरशातून धार्मिक शिक्षण दिले जात असावे. याखेरीज
आजच्या अर्थाने, आपण ज्याला सार्वत्रिक शिक्षण म्हणतो ते कुठेही उपलब्ध असल्याचे
दिसत नाही. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र त्यांची प्रशासकीय गरज म्हणून म्हणा पण
सार्वत्रिक शिक्षणाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेला दिसतो. त्यामध्ये सुद्धा
सुरुवातीला फक्त ‘लिहिणे वाचणे व हिशेब’ या पुरतेच हे शिक्षण मर्यादित होते; कारण ब्रिटीशाना
कारकुनांची गरज होती. पण एकदा लिहायला, वाचायला सुरुवात झाली की माणसाच्या
जिज्ञासा जागृत होवून ज्ञानाची भूक वाढू लागते व मग त्याच्या अधिक ज्ञान गृहण
करण्याच्या इच्छेला कुणीच रोकू शकत नाही व झालेही तसेच. पण तरी सुद्धा त्या
काळीसुद्धा या शिकणाऱ्या वर्गांत तथाकथित उच्च्यवर्णीयांचाच भरणा होता. हळूहळू इतर
जाति जमातीही शिक्षणाच्या क्षेत्रांत येवू लागल्या. तरीही स्त्रियांना पारंपारिक शिक्षणास
मज्जाव होता. सर्व जाति धर्मांच्या मुलींसाठी पहिली शाळा पुण्यांत सुरु करण्याचे
श्रेय मात्र कै.सावित्रीबाई फुले यांनाच द्यावे लागते. हळू हळू महाराष्ट्र, बंगाल.
पंजाब व तामिळ प्रांतात शिक्षणाचा प्रसार झाला.व त्यांत मुबई, मद्रास व कलकत्ता
विद्यापीठांनी पुढाकार घेतला.
या सर्व शिक्षणाचा
साच्या मात्र एकच राहिला. प्राथमिक शिक्षणांत मातृभाषा ओळख, लिहिणे वाचणे,
व्यावहारिक अंकगणित, ब्रिटीश इतिहासकारानीच लिहिलेला इतिहास व जगाचा जुजबी भूगोल
या विषयांचा समावेश होता; व हे शिक्षण केवळ ब्रिटीश सत्तेसाठी उपयुक्त कारकुनांची
फौज तयार करण्या इतपतच उपयुक्त होते. कारकुनी शिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन
मिळवून देण्यासाठी मात्र हे शिक्षण कुचकामाचे ठरू लागले. उलट असे शिक्षण घेतलेल्या
शिक्षितांना आपले पिढीजात पारंपारिक व्यवसाय करण्याची लाज व कंटाळा वाटू लागला.
माध्यमिक शिक्षणांत
‘इंग्रजी’ व ‘विज्ञान’ या दोन नवीन विषयांचा समावेश झाल्यामुळे या शिक्षणाने शिक्षितांच्या
ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या व ज्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य होते, त्यांनी अधिक
शिक्षणाची कास धरली. त्याच सुमारास मुंबई ,पुणे, मद्रास, कलकत्ता, बडोदे वगैरे
ठिकाणी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाची सोय झाल्या मुळे एक उच्च्य शिक्षित
वर्ग तयार झाला. साधारणपणे याच सुमारास परदेशांतही शिक्षणाची द्वारे खुली
झाल्यामुळे अनेकांनी त्याचा लाभ घेतला.
साधारणपणे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत व
थोड्या बहुत प्रमाणात आजहि शिक्षणाचा हाच ढांच्या अस्तित्वांत आहे.
लोकमान्य टिळक,
पं.मदनमोहन मालवीय यांनी ‘राष्ट्रीय शिक्षणा’चा विचार मांडला व कांही शिक्षण
संस्थाही त्या अनुसार देशभरांतील विविध भागांत सुरू करून नावारुपास आणल्या. पण
देशांतील शिक्षण-विचारांत अमुलाग्र बदल सुचविण्याचे श्रेय मात्र म.गांधीनी १९३७
साली सुचविलेल्या ‘बुनियादी शिक्षण’ किंवा ‘नई तालीम’ या संकल्पनेलाच द्यावे
लागेल.
या लेखांत ‘आजचे शिक्षण’ व म.गांधीनी सुचविलेले
‘बुनियादी शिक्षण’ किंवा ‘मूलोद्योग शिक्षण’(नई तालीम) यांची तुलना, व्यवहार्यता व
उपयुक्तता यांचा उहापोह करण्याचा माझा प्रयत्न आहे.
गांधीजींच्या
स्वराज्याच्या कल्पनेत शोषणमुक्त, शासनमुक्त, प्रत्येकाच्या विकासास पूर्ण वाव
असलेला, जो प्रत्येकाला ‘माझे राज्य’ वाटेल, असा आदर्श समाज होता. स्वराज्याचा खरा
अर्थ आमच्या लक्षांत आला असता,तर जुने राज्य संपल्याबरोबर जुनी शिक्षण पद्धतीही
संपली असती.परंतु, नव्या राज्याबरोबर जुनेच शिक्षण चालू राहिले. आणि
विद्यार्थ्यांत बेकारी व बेशिस्त वाढू लागल्याचे पाहून पुढाऱ्यांच्या मनांत ‘नई
तालीम’ चा विचार घोळू लागला. पण ‘बेकारी व बेशिस्त घालविणे’ हे नई तालीमचे किमान
लाभ झाले. मुख्य लाभ हा ‘नवीन मूल्यांची स्थापना’ हा होता.
गांधीजींची ‘नई तालीम’ही
जीवन ‘साक्षर’ करण्यापेक्षा ‘सार्थक’ करण्यावर भर देत होती. ‘अक्षर शिक्षणावर आपण
फाजील भर देवू नये’. फक्त आवश्यक तेवढाच अक्षर संस्कार मुलावर करावा व मुलांच्या
‘बुनियादी’ शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे त्यांचे मत होते. कारण ‘साक्षर-जीवन’
निरर्थक असू शकते, त्या उलट ‘निरक्षर जीवन’ खऱ्या अर्थाने ‘सार्थक’ ठरू शकते,
जसे-मोहम्मद पैगंबर किंवा संत तुकाराम.
गांधीजींच्या मते अध्ययनासाठी
बाहेरच्या प्रेरणेची गरज भासू नये, ती आंतूनच असायला हवी. विद्यार्थ्यामध्ये ज्ञान
भरीत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये ज्ञानाची तृष्णा उत्पन्न करण्याला ‘नई तालीम’
जास्त महत्त्व देते.
तसे, कोणत्याही भारतीय
भाषांमध्ये इंग्रजी प्रमाणे ‘शिकणे’ व ‘शिकविणे’ असे वेगळे शब्द नाहीत. ‘शिकायला
मदत करणे’ म्हणजे ‘शिकविणे’ असा कृत्रिम शब्द नंतर बनविला गेला आहे. शिक्षक
विद्यार्थ्याला शिकायला मदत करतो. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकमेकाच्या
आचरणापासून शिकत असतात.त्या अर्थाने दोघेही विद्यार्थीच असतात.
वेदामध्ये शिक्षकाला ‘गातुवित्’ म्हणजे मार्ग
शोधून काढणारा, मार्गदर्शक-Path finder- म्हटलेले आहे. शिक्षक हा साऱ्या देशाला बुद्धीचे व हृदयाचे मार्गदर्शन
करणारा आहे, त्यासाठी तो सर्व श्रेष्ठ व शक्तिशाली असला पाहिजे. म्हणूनच वेदांनी
त्याला ‘शचिष्ठ’ म्हणजे शक्तिशाली म्हटले आहे.
वेदांनी शिक्षकांकडून समाजाच्या काय अपेक्षा आहेत, हेहि नमूद करून
ठेवले आहे.
‘आमचे अज्ञान निरसन करण्याचा मार्ग, आमच्या
भुकेचे निरसन करण्याचा मार्ग, आणि आमच्या आरोग्याचे संवर्धन करण्याचा मार्ग त्याने
आम्हाला दाखवावा’ अशी अपेक्षाही वेदांनी व्यक्त केलेली आहे. त्यासाठी तो ज्ञानांत
प्रवीण, उत्पादनांत बलवान, व विविध प्रकारचे सृष्टीचे ज्ञान असलेला (आरोग्य
संवर्धनासाठी) असावा, अशी वेदांची अपेक्षा आहे.
हल्लीच्या शिक्षणपद्धती मुळे जीवनाचे दोन अलग तुकडे पडतात.
१)
पहिली
१५ ते २० वर्षे मनुष्याने जगण्याच्या भानगडीत न पडता, नुसते शिकत राहायचे, व नंतर,
२)
शिक्षण
गुंडाळून मरेपर्यंत जगत राहायचे.
गांधीजींच्या मते ‘जीवन जगणे आणि शिक्षण’हे
दोन्ही बरोबरच आणि एकाच वेळी सातत्याने होत रहावे. भगवंतानी अर्जुनाला जशी
कुरुक्षेत्रावरच भगवद्गीता सांगितली, भगवद्गीतेचे आगावू वर्ग घेवून मग त्याला
कुरुक्षेत्रांत ढकलले नाही,(व म्हणूनच त्याला ती पचली),तसेच शिक्षण व जीवन जगणे या
दोन अलग वेळी करावयाच्या गोष्टी असायला नकोत. जीवन जगताना येणाऱ्या अडचणीतूनच
शिक्षण व्हायला हवे. ‘जीवनाची जबाबदारी ही भयानक वस्तु नाही’हे त्याला शिक्षणाच्या
काळातच समजले पाहिजे.
‘जीवन म्हणजे कलह’ हा समज चुकीचा आहे. जीवन जर
जगण्यालायक वस्तु आहे, तर ती मुलाला आवश्य जगू द्या. त्याशिवाय त्याला शिक्षण
मिळणार नाही.
भगवद्गीता जशी कुरुक्षेत्रांत, तसे शिक्षणही
जीवन क्षेत्रांतच दिले पाहिजे; नव्हे तिथेच ते मिळू शकेल. अर्जुनापुढे प्रत्यक्ष
कर्तव्य करीत असताना प्रश्न निर्माण झाला, व त्याचे उत्तर देण्यासाठी भगवद्गीता
निर्माण झाली. यालाच ‘जीवन-शिक्षण’ म्हणायचे.
आवडीच्या व्यवसायांतून येणाऱ्या अडचणीतून जगण्याचे शिक्षण हवे.
शिक्षण हे कर्तव्य-कर्माचे अनुषंगिक फळ असावे. जो जो कर्तव्य कर्म
करतो त्याला ते नकळत मिळते, जसे राम-लक्ष्मणांना विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण
करीत असतानाच धनुर्विद्येचे शिक्षण मिळाले. थोडक्यांत, जीवन हे मुख्य केंद्र करून
त्याच्या आसपास सर्व शिक्षण उभे केले पाहिजे. अशाने जीवनाचे दोन तुकडे होणार
नाहीत. जीवनाची जबाबदारी अचानक येवून पडल्याने येणाऱ्या अडचणी येणार नाहीत व
शिक्षण न कळत मिळत राहील.
सध्या ‘फक्त शिक्षण’ म्हणजे जीवनापासून तोडून वेगळे काढलेले शिक्षण
चालू आहे.
शिक्षकाला पूर्वी ‘आचार्य’ म्हणजे ‘आचारवान’ म्हणत असत. स्वतः आदर्श जीवन
जगून राष्ट्राकडून ते आचारवून घेणारा, तो ‘आचार्य’अशी संकल्पना होती. अशा
आचार्यांच्या कर्तव्यानेच इतिहासांत बलशाली राष्ट्रे निर्माण झाली.उदा.आर्य
चाणक्य,व विद्यारण्य स्वामी.
शिक्षणाचे तीन विभाग-
रुसोने शिक्षणाचे तीन विभाग कल्पिलेले आहेत.
१)
निसर्ग
शिक्षण, २) व्यवहार शिक्षण, व ३) व्यक्ति शिक्षण.
१)
निसर्ग
शिक्षण-
मनुष्याची
आंतल्या आंत होणारी शारीरिक, मानसिक, व बौद्धिक वाढ, हे निसर्ग शिक्षण होय. ते
गर्भावस्थेत असतानाच सुरु झालेले असते. गर्भामधील बालकास सर्वप्रथम ‘ध्वनि व
स्पर्शाचे ज्ञान व्हायला गर्भावस्थेतील चौथ्या-पाचव्या महिन्यातच सुरुवात होते.
बाहेरील आवाज व गर्भ-जलांतील तापमानामध्ये झालेल्या फरकाने गर्भाच्या हालचाली व
हृदयाचे ठोके कमी-जास्त होत असल्याची नोंद वैद्यक शास्त्राने करून ठेवलेली आहे. हे
‘निसर्ग-शिक्षणाचे’ उत्तम उदाहरण आहे. जन्मानंतर दृश्य,रस व गंध यांचे ज्ञान
बालकास क्रमाक्रमाने होवू लागते. आजू बाजूच्या लोकांच्या हालचाली, चेहऱ्यावरील
भाव, स्पर्शामधील उब किंवा आपुलकी या द्वारे बालकाला त्या व्यक्तीच्या
आपल्याविषयीच्या भावनांचे ज्ञान हळू-हळू होवू लागते. त्याप्रमाणे ते प्रतिसादही
द्यायला शिकते. हळू-हळू समोर आलेली वस्तु हातांत धरून तोंडात घालणे, व त्याची चव व
वास घेणे या क्रियाद्वारे बालक पांचीही ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करून बाह्य
जगाचे ज्ञान घ्यायला आपोआपच शिकत. हे सर्व ‘निसर्ग-शिक्षण’ होय.
२)
व्यवहार-शिक्षण-
मनुष्याला
बाह्य परिस्थितीवरून जे ज्ञान होते व दैनंदिन व्यवहारामध्ये जो अनुभव येतो, त्याला
रुसोने ‘व्यवहार-शिक्षण’ असे म्हटलेले आहे.
३)
व्यक्ति-शिक्षण-
निसर्ग
शिक्षणाने झालेल्या आत्म-विकासाचा व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने बाह्य जगांत काय
उपयोग करावा, या विषयी अन्य व्यक्तिंच्या मदतीने जे वाचिक, सांप्रदायिक, किंवा
शाळा-महाविद्यालयामधून दिले जाणारे शिक्षण म्हणजे ‘व्यक्ति-शिक्षण’होय.
यांतील फक्त
‘निसर्ग-शिक्षण’ हे आंतून मिळते व ‘व्यवहार-शिक्षण’ तसेच ‘व्यक्ति-शिषण’ हे
बाहेरूनच घ्यावे लागते; म्हणून पू.विनोबाजीनी रुसोच्या तीन प्रकारच्या शिक्षणाला
फक्त ‘अंतःशिक्षण’ व ‘बाह्य शिक्षण’ या दोन गटातच विभागले आहे.
बाह्य शिक्षण हे शाळामधूनच मिळते असे नाही, तर ते या अनंत विश्वामधील
प्रत्येक पदार्थापासून मनुष्याला एकसारखे मिळतच असते व त्यांत कधीही खंड पडत नाही;
बऱ्याच वेळा ते आपल्याला न कळतही मिळत असते.(दत्तात्रेयांच्या २४ गुरूंच्या
कथेमागील सार हे आहे.) त्याची सुरुवात मात्र घरापासून, म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिणी, इतर नातेवाईक,सभोवतालच्या व्यक्ति व वस्तु या पासून होते.व त्याची
सांगता शाळा-महाविद्यालयामध्ये होते.
हे सर्व शिक्षण चर्म-चक्षु(डोळे), दिव्य-चक्षु(कल्पनाशक्ती),
ज्ञान-चक्षु(तर्क),व दूर-चक्षु(आधुनिक यंत्रसामुग्री) या द्वारे होते.
‘सृष्टि’ हा परमेश्वराने आमच्या अभ्यासासाठी निर्माण केलेला व उघडून
ठेवलेला एक दिव्य, शाश्वत, आश्चर्यकारक व पवित्र ग्रंथ आहे. त्यापुढे सर्व वेद,
बायबल, कुराण हे सर्व ग्रंथ दुय्यम आहेत.
शिक्षण म्हणजे आपण विविध मार्गाने गोळा केलेली माहिती मरून उरलेले
संस्कार होत. आपण जितक्या गोष्टी पाहतो, ऐकतो, वाचतो, त्यापैकी फारच थोड्या गोष्टी
आपल्या कायमच्या स्मरणांत राहतात. या स्मरणांत राहिलेल्या गोष्टी म्हणजेच
‘संस्कार’.
शिल्पकाराला मातीतून, दगडातून पुतळा निर्माण करायचा नसतो, तर तो
त्यांत दडलेलाच असतो. त्याला फक्त वरचे अनावश्यक थर काढून त्याला प्रकट करायचा असतो.
शिल्पकाराचे जे काम आहे, तेच काम शिक्षकाला करावयाचे असते.
सहज-शिक्षण.
‘शिक्षण’ हे ‘सहज शिक्षण’ व्हायला हवे. विद्यार्थ्याला आपण शिकत आहोत,
असा भाव निर्माण झाला की त्यांतले स्वारस्य संपले. जसे खेळामध्ये ‘व्यायाम’आपोआपच
होत असतो, पं ‘मी व्यायाम करीत आहे’ हा भाव नसतो, खेळताना त्या मुलासाठी आसपासचे
जग अस्तित्वांतच नसते, इतकी तद्रूपता त्यांत आलेली असते.तहान, भूक,थकवा,
दुखापत,इत्यादि कांहीही त्यांना जाणवत नाही. सारांश, ‘खेळ’ म्हणजे ‘निखळ आनंद
‘असतो. ते ‘व्यायाम-रूप’ कर्तव्य नसते. हीच गोष्ट ‘शिक्षणाला’ लागू केली पाहिजे.
‘शिक्षण’ म्हणजे ‘कर्तव्य’ या भावनेपेक्षा, ‘शिक्षण’ म्हणजे ‘आनंद’ ही नैसर्गिक
भावना विकसित झाली पाहिजे.
हल्लीच्या शिक्षणांत ‘शिक्षण म्हणजे आनंद’ ही भावना तर राहूच द्या,
‘शिक्षण म्हणजे कर्तव्य’ ही भावनाही राहिलेली नाही, त्याऐवजी ‘शिक्षण म्हणजे
शिक्षा’ ही वैफल्याची व गुलामगिरीची भावनाच बहुसंख्य विद्यार्थ्यांत दिसून येते.
विद्यार्थ्यांचे शिक्षण ‘न कळत’ अथवा ‘सहज’ झाले पाहिजे. बालपणी मुलगा
मातृभाषा ज्या पद्धतीने शिकतो,त्याच पद्धतीने पुढचेही शिक्षण झाले पाहिजे. मुलाला
‘व्याकरण’ म्हणजे काय?’ हे जरी माहिती नसले तरी, ‘आई आला’ असे तो कधीच म्हणत नाही.
म्हणजे त्याला व्याकरण समजलेले आहे. त्याला ‘व्याकरण’ हा शब्द कदाचित माहिती नसेल,
त्याचे नियम, परिभाषा अवगत नसेल; पण व्याकरणाचे कार्य होवून चुकले आहे.
विद्यार्थ्याला ‘तर्क-शक्ति’ मूळचीच असते. तिला वारंवार खाद्य मिळेल,
असे प्रसंग आणून द्यायचे, इतकेच शिक्षणाचे कार्य आहे.
सर्व शास्त्रे, कला, सद्गुण यांची बीजे माणसामध्ये स्वयंभूच असतात. ती
आपणास फक्त दिसत नाहीत. पण दिसत नसते, म्हणून ते नसतेच, असे मात्र होत नाही.
मनुष्य स्वभावतःच दुष्ट नसतो. तसे असते तर शिक्षणाला आशाच राहिली
नसती. वस्तूपासून तिचा मूळचा स्वभाव दूर करणे तर्कदृष्ट्या अशक्य असल्या मुळे,
मानवी स्वभाव मूळचाच दुष्ट असेल तर त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न फुकट जातील.
‘आपण शिक्षण घेत आहोत’ असा भासच विद्यार्थ्याला होणार नाही, अशी
शिक्षणाची रचना हवी. गुरु स्वतः ‘सहज-शिक्षक’ असल्याशिवाय ‘सहज-शिक्षण’ मिळणे शक्य
नाही.
‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ अशा रीतीने जे ‘गुरुमुखातून व
गुरु-कृतीतून’ बाहेर पडते तेच खरे ‘सहज-शिक्षण’.
जगण्याच्या क्रियेतच शिक्षण मिळाले पाहिजे. जगण्याच्या क्रिये बाहेरची
शिक्षण म्हणून एक स्वतंत्र क्रिया बनते, तेंव्हा एखादे विजातीय द्रव्य शरीरांत
शिरले असता, जो परिणाम होतो, तसाच या शिक्षणाचा मनावर विषारी व रोगट परिणाम होतो.
कर्माची कसरत केल्याशिवाय ज्ञानाची भूक लागत नाही. अशा स्थितीत जे
ज्ञान विजातीतत्वाने आंत घुसते, ते पचविण्याची ताकत मेंदूला नसते. अशा आधाशीपणाने
खाल्लेल्या ज्ञानाचे अपचन होवून बौद्धिक अमांश होतो व त्यांतच मनुष्याचा नैतिक
मृत्यु होतो.
जेथे प्रत्यक्ष आचरण चालते, पण ‘विचार-मंथन’ होत नाही, तो ‘कर्मयोग’.
आपले असंख्य शेतकरी व कष्टकरी प्रत्यही तेच करीत असतात. पण ज्ञान आणि कर्म यांचा
भेद जिथे नाहीसा होतो, ती ‘नई-तालीम’.
अभ्यासांत ‘लांबी-रुंदी’ महत्वाची नाही, तर खोली महत्वाची आहे. व
‘समाधियुक्त’ खोल अभ्यासाशिवाय ज्ञान नाही.
अभ्यासाने प्रज्ञा स्वतंत्र व प्रतिभावान व्हायला हवी. ’प्रतिभा’
म्हणजे बुद्धीला फुटणारे नवीन कोंभ. नवीन कल्पना, नवीन उत्साह, नवीन शोध, नवीन
स्फूर्ती, हे प्रतिभेचे लक्षण आहे. ही प्रतिभा भाराभर वाचनाने नेमकी मरायची.
लहान मुलांना सुरुवातीला जे शिक्षण द्यायचे असते, ते केवळ ‘आई’च देवू
शकते. म्हणून प्रत्येक गावांत अगोदर स्त्रियांच्या शिक्षणाची योग्य सोय झाली
पाहिजे.
थोडक्यांत गांधीजींच्या ‘नई तालीम’ची संकल्पना
‘व्यवसायांतून शिक्षण’ या कल्पनेवर आधारलेली आहे. त्यासाठी मुलाच्या लहान वयांतच
त्याने पुढे कोणता व्यवसाय करावा, हे निश्चित करून त्या प्रमाणे त्याला त्या त्या
व्यवसाय-शिक्षणाच्या शाळेत पाठवावे लागेल. अर्थांत हा निर्णय ते मूल घेवू शकत नाही
म्हणून तो त्याच्या पालकांना किंवा त्याचा कल बघून गुरूलाच घ्यावा लागेल. व
त्यांतूनच नवी ‘जाति-व्यवस्था’ निर्माण होवू शकेल. हा धोका पत्करण्याची आपली तयारी
आहे का? याचा विचार व्हायला हवा. पूर्वीच्याकाळी घरोघर दिल्या जाणाऱ्या पारंपारिक
व्यावसायिक शिक्षणांत ही सोय होती व त्यामुळे त्या काळांत बेकारीही नव्हती. हे जरी
खरे असले, तरी त्या मध्ये सर्वांना समान विकासाच्या संधीच्या तत्वाची पायमल्ली
होताना दिसते. बहुतेक पालकांना आपल्या पाल्याला एखाद्या प्रतिष्ठित व्यवसायाचेच
शिक्षण मिळावे, असे वाटणे गैर नाही. तशी संधी आपण सर्वाना देवू शकणार आहोत का? आज
अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकडे सर्व विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसते त्या
मागे ही हेच कारण आहे. त्यासाठी देशाला कोणत्या व्यावसायिकांची किती गरज आहे, याचा
अगोदर अभ्यास करून त्याप्रमाणे गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया आखायला हवी.
जुनी तालीम व नई तालीम यांतील फरक –
१) जुनी तालीम ‘चोरी
करणे’ हे पाप समजते, तर नई तालीम चोरीच नव्हे तर ‘अधिक संग्रह करणे’ हे ही पाप
समजते.
२) नई तालीम शारीरिक व बौद्धिक श्रमांच्या मूल्यांत फरक करीत नाही.
श्रम प्रतिष्ठा मानते.
३) जुनी तालीम क्षमतेस महत्त्व देते; तर नई तालीम क्षमतेला समतेची
दासी मानते.
४) जुनी तालीम ‘लक्ष्मी,सरस्वती व शक्ति’ यांना स्वतंत्र देवता मानून
त्याची पूजा करते; तर नई तालीम ‘मानवतेची’ पूजा करते.
१९५३ नंतर ‘नई तालीम’ या संकल्पनेचा अंशतः
स्वीकारही झाला; पण तिला बदनाम करण्याचाही हेतूपूर्वक प्रयत्नही झाला. नई तालीम
खर्चिक आहे, त्यांत ज्ञानाची उणीव आहे, असे दाखवून पालक व विद्यार्थी असंतुष्ट व्हावेत असे
प्रयत्न झाले व तो प्रयोग बारगळला. मूलोद्योग-शिक्षण
मुलांचे सर्व शिक्षण एखाद्या मूळ उद्योगावर
उभारायचे. उद्योगाने शिक्षणाला उब द्यायची व शिक्षणाने उद्योगावर प्रकाश टाकायचा,
हा ‘मूलोद्योग-शिक्षणाचा’ मूळ उद्देश्य होता. याचे नाव ‘समवाय-पद्धति’. यांत कोणता
तरी जीवन व्यापी व विविध अंगे असलेला मूळ उद्योग ‘शिक्षणाचे द्वार’ म्हणून
स्वीकारलेला असतो. हा उद्योग केवळ शिक्षणाचे साधन म्हणून नव्हे, तर शिक्षणाचे
अविभाज्य अंग म्हणून घेतलेला असतो. त्या उद्योगाच्या आधारे –
अ) मुलाच्या शक्ति विकसित करणे,
ब) मुलाला जीवनोपयोगी विविध ज्ञान देणे,
क) मुलाला उपजीविकेचे एक समर्थ साधन पुरविणे,
असा तिहेरी उद्देश्य असतो.
या उद्योगाच्या सिद्धीचा एक लहानसा पण महत्त्वाचा पुरवा म्हणून
मुलाच्या उद्योगांतून शाळेच्या खर्चाचा एक हिस्सा मिळावा, अशी अपेक्षा असते.
परिश्रम -निष्ठा
‘परिश्रम’ निराळे आणि ‘परिश्रम-निष्ठा’ निराळी. जगांत बहुतेक लोक
परिश्रम करणारेच आहेत; पण ते,ते श्रम केवळ लाचारीने करतात. त्यांतील अनेक जण
शक्यतो ते श्रम टाळू पाहतील. कांही जण ते श्रम टाळून त्याचा बोजा दुसऱ्यावर टाकतील
आणि पुन्हा वर ‘प्रतिष्ठित’ होवून बसलेले असतील. यांतूनच साम्राज्यवाद,
भांडवलशाही, युद्धे, सामाजिक व आर्थिक विषमता इत्यादि निर्माण झालेली दिसतात.
या सर्वावर ‘शरीर परिश्रम-निष्ठा’, म्हणजे शरीराने कांहीतरी परिश्रम
केल्याशिवाय शरीराला ‘अन्न’ देणे हा एक स्वतः विरुद्ध व समाजाविरुद्ध केलेला
गुन्हा आहे, अशी भावना निर्माण होणे, हाच एकमेव उपाय आहे. बसवेश्वराच्या ‘कायक वे
कैलास’ या संकल्पनेमागे हीच भावना होती.
ही भावना ‘मूलोद्योग-शिक्षण’ किंवा ‘नई-तालीम’ च्या शिक्षितांत
उत्कटतेने निर्माण झाली पाहिजे.
मुलगा शिकला म्हणजे गायीचे शेण काढायला लाजतो,
कंटाळतो, आणि दूध प्यायला उल्हासतो, असे न होता
या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडलेला मुलगा ‘गायीचे शेण काढायला उल्हासतो व
दूध प्यायला-इतरांना ते मिळत नाही म्हणून संकोचतो’ असे चित्र निर्माण व्हायला हवे.
त्यासाठी विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांनीही ‘शरीर परिश्रमांत’ यथाशक्ति भाग घेतला
पाहिजे. शाळेच्या वेळाशिवाय तो आणि त्याचे कुटुंबीय सुटीच्या दिवशी खेड्यांतील इतर
कामकरी मंडळी प्रमाणे हौसेने ‘अंग मेहनत’ करीत आहेत असे दृश्य विद्यार्थ्यांना
दिसले पाहिजे. खेड्यांतील साफ-सफाई सारखी कामे विद्यार्थी व शिक्षकानी मिळून केली
पाहिजेत. असे झाल्याशिवाय विद्यार्थ्यामध्ये ‘परिश्रम-निष्ठा’ निर्माण होणार नाही.
म.गांधींच्या मूलोद्योग शिक्षण पद्धतीचा संपूर्ण
विचार केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षांत येते, ती म्हणजे ही शिक्षण पद्धति
एखाद्या मूळ उद्योगांतून मुलाला उपजीविकेचे समर्थ साधन मिळवून देण्यावर भर देते. त्यामुळे
आजच्यासारखी बेकारी निर्माण होणार नाही, असे त्यांचे मत. पण या ‘मूळ उद्योगांत’
ज्या तीन उद्योगांचा समावेश त्यांनी केला होता ते म्हणजे सूत कताई, शेती व
सुतारकाम, याशिवाय कितीतरी उद्योग आज विकसित झालेले आहेत; त्यांच्या शिक्षणाचा
अंतर्भाव त्या ‘मूलोद्योग शिक्षणांत’ नव्हता. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना या तीन
गटांत विभागूनही बेकारी निर्माण झालीच असती. कारण सर्वाना या तीन व्यवसायांत
सामावणेही शक्य नव्हते. त्याऐवजी प्रत्येक घरांत चालत आलेले पारंपारिक व्यवसाय
चालू ठेवण्याने आजची जन्माधारित जाति-व्यवस्था अधिकच बळकट झाली असती. त्यादृष्टीने
विचार केल्यास शालेय शिक्षण संपल्यानंतर आज दिले जाणारे ‘औद्योगिक प्रशिक्षणच’
अधिक बरे, म्हणायला हरकत नाही.
व्यवसायाचे शिक्षण आधी ज्ञान(Theory) व मग अनुभव(Practical), अशा स्वरूपांत न देता पहिल्या दिवसापासूनच
व्यवसायांतील प्रत्यक्ष अडचणीशी विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष परिचय करून देता आला तर
त्या अडचणीच्या सोडवणूकीतूनच त्याला त्या व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञानही मिळू शकेल.
अशी व्यवस्था थोडी फार वैद्यकीय शिक्षणांत दिसून येते. पण तीही आदर्श नाही. मुलाचे
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षांतच प्रत्यक्ष रुग्णावर
ईलाज करण्याचे शिक्षण दिले जाते. तेच शिक्षण अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासूनच देण्याकडे
आता वैद्यकीय शिक्षण परिषदेचा कल आहे.
सध्याच्या शिक्षण पद्धतीतील आणखी एक दोष म्हणजे
मुलाला वयाच्या दुसऱ्या –तिसऱ्या वर्षापासूनच बालवाडी, शिशुविहार, प्ले-ग्रुप
मध्ये दाखल करून दिवसांतील ४-५ तास त्यांत अडकवून ठेवले जाते. हे त्या मुलाच्या
वयाच्या मानानी अन्यायकारक आहे, असे मला वाटते. त्या ऐवजी या वयांतील मुलाला घरीच
पालकासमवेत राहू दिले, तर अधिक चांगले होईल. पण या बाबतीत पालकांचीही अपरिहार्यता
समजून घेण्यासारखी आहे. उदा.जिथे दोन्ही पालक कामावर जाणारे आहेत, त्यांनी आपल्या
मुलांना कुठे ठेवावे, असा प्रश्न उपस्थित
होवू शकतो.
दुसरा एक असाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या
शाळांची असलेली भरमसाठ फी. ती पहिली म्हणजे यामधून नवीन चातुर्वर्ण्याची सुरुवात
होईल की काय? असे वाटते. ज्यांच्याकडे भरपूर फी भरण्याची क्षमता आहे,त्यांचीच मुले
या पुढे चांगले व उच्च प्रतीचे शिक्षण घेवू शकतील असे वाटते. ज्यांच्याकडे ती
क्षमता आहे, ते नव्या युगांतील ब्राह्मण व ज्यांच्याकडे ती नाही ते नव्या युगांतील
‘शूद्र’. यावरील उपाय म्हणजे पूर्व-प्राथमिक शिक्षण सर्वांनाच मोफत व सक्तीचे करणे
व ज्या त्या विभागांतील शाळांना त्या त्या विभागांतील मुलांना प्रवेश देण्याचे
बंधन घालणे. या मुळे गरीब-श्रीमंत या सर्वांच्या मुलांना एकाच प्रतीचे व एकत्र शिक्षण
मिळून एकमेकांत मिसळण्याची संधी मिळू शकेल व सामाजिक समरसता निर्माण होण्यास मदत
होईल.
तिसरा महत्त्वाचा दोष म्हणजे ‘देणग्या’ घेवून
मुलांना प्रवेश व ‘देणग्या’ घेवून शिक्षकांना नोकऱ्या. या मुळे ना
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण राहते ना शिक्षकांच्या. विद्यार्थ्यांचा
प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर (प्राथमिक विभागांत) न केला तरी चालण्या सारखे आहे;
पण शिक्षकांची नेमणूक गुणवत्तेच्या आधारावरच हवी, तरच ते विद्यार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देवू शकतील.
चौथा दोष म्हणजे प्रचलित ‘परीक्षा-पद्धति’ ही
विद्यार्थ्याच्या ज्ञाना ऐवजी त्याच्या स्मरणशक्तीची परीक्षा पाहणारी आहे; ती
ज्ञानाची व अनुभवाची चाचणी घेणारी असावी.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘शिक्षण’हे नोकरीच्या शोधांत भटकावे
लागणारे असू नये; तर स्वयंरोजगार निर्माण करणारे असावे. व हीच गांधीजींच्या
‘नई-तालीम’ मागची प्रेरणा व त्यांची इच्छा होती. व ती आपण या प्रकारे पूर्ण करू
शकू, असे मला वाटते.
Atishay abhyaspurn wivechan!
उत्तर द्याहटवाHard Rock Hotel Casino & Spa - MapyRO
उत्तर द्याहटवाFind out 평택 출장샵 what's popular at 오산 출장샵 Hard Rock Hotel Casino & Spa in Las 고양 출장샵 Vegas and 의정부 출장안마 nearby. Las Vegas, NV 논산 출장샵 United States, Interstate 5,
खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख आहे .
उत्तर द्याहटवा